परिमल नाईक; न्यायालयाचे नाव पुढे करुन अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करणे चुकीचे…
सावंतवाडी,ता.०७: येथील पर्णकुटी विश्रामगृहासमोर असलेली धोकादायक झाडे तोडणे गरजेचे आहे. ती सर्वस्वी जबाबदारी बांधकाम विभागाचीच आहे. त्यामुळे अधिकार्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये, अशी भूमिका सावंतवाडीचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक परिमल नाईक यांनी केली आहे. येथील जुन्या न्यायालय परिसरात असलेली झाडे तोडण्याबाबत ब्रेकिंग मालवणीने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची गंभीर दखल श्री.नाईक यांनी घेतली त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली.
ते म्हणाले, ही धोकादायक झाडे ही बापुसाहेब महाराज यांच्या काळात लावण्यात आलेली आहेत. मात्र सदयस्थिती परिस्थिती लक्षात घेता, ती जीर्ण झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ती तोडण्यात यावी, ही मागणी आपण मागचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे गेल्यावर्षी केली होती. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता परिसरात दोन शाळा एक महाविद्यालय आणि शहरात येणारा मुख्य रस्ता हाच असल्यामुळे ही झाडे तोडणे गरजेचे आहे. मात्र ती झाडे तोडण्यावरुन न्यायालयाच्या परवागनीचे कारण पुढे करुन
बांधकाम विभागाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुर्तास ही जबाबदारी बांधकाम विभागाचीच आहे. त्यांनीच ही झाडे तोडणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी त्यांनी टोलवू नये, असे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.