राजन तेलींची टीका; दोन हजार कोटी सोडा, दोन कोटींचा रस्ता तरी मार्गी लावला का…?
सावंतवाडी ता.२५: तब्बल तीन वेळा आमदार आणि पाच वर्षे मंत्री राहिलेल्या आमदार दीपक केसरकरांनी कोटीची घोषणा करू नये. पाचशे आणि दोन हजार कोटीचा प्रकल्प सोडा, दोन कोटीचा रस्ता तरी पुर्ण केला का? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. निवडणूका जवळ आल्याने केसरकर अशा प्रकारे खोट्या घोषणांचा पाऊस पाडून लोकांची दिशाभूल करीत आहेत. मात्र सर्व आश्वासने फसवी आहेत. त्यांनी पंधरा वर्षात केलेली उद्घाटने व भूमिपूजनातील एक तरी विकासकाम मार्गी लागले का याचाही खुलासा केसरकर यांनी करावा असे परब म्हणाले.
श्री तेली यांनी याठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर उपस्थित होते.
श्री तेली म्हणाले, निवडणुका जवळ आल्या आहेत.त्यामुळे आमदार केसरकर जोरदार घोषणांचा पाऊस पाडत आहेत.कोट्यवधींची कामे आपण आणल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत आहेत. गेले पंधरा वर्षे आमदार होते. पाच वर्षे मंत्री होते. या काळात त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास दिसला नाही का? त्यांनी आजपर्यंत केलेल्या भूमिपूजन आणि उद्घाटन यांच्या कामाचे काय झाले?ते प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले का? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सारखा प्रकल्पाचे काय झाले?असा प्रश्न तेली यांनी केला. दोडामार्गमध्ये दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प सांगणाऱ्या केसरकरांनी बांदा दोडामार्ग रस्ता दोन कोटीच्या कामाचे काय केले. रस्त्याची परिस्थिती आता काय आहे. काहीच करायचे नाही अशी परिस्थिती केसरकर यांची आहे.हे जनतेला ठाऊक आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून दिली आहे. असेही ते यावेळी म्हणाले.