गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर;अन्यथा अधिका-यांना काळे फासण्याचा इशारा
सावंतवाडी,ता.२५: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या परिस्थितीवरून आज भाजपचे पदाधिकारी पुन्हा एकदा आक्रमक झाले.त्यांनी बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराव घातला.रस्त्याचे टेंडर झाली नाही तर उद्घाटन केलेच कसे?असा सवाल करीत जो पर्यंत कामाबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही.नसेल तर कार्यालयालाच टाळे ठोकू,असा इशारा यावेळी देण्यात आला.आम्ही वेळोवेळी आंदोलने केली,उपोषणे केली. मात्र आश्वासना पलिकडे आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही.त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आता माघार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,अक्रम खान, केतन आजगावकर,शेखर गावकर,मधुकर देसाई,गुरुनाथ पेडणेकर,मकरंद तोरसकर,आत्माराम गावडे,उदय देऊलकर,प्रविण देसाई,अमित परब आदी उपस्थित होते.
दरम्यान याबाबत मंत्रालयात उद्या बैठक आहे. येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यानंतर पुढील भूमिका घेवू, असे आश्वासन सौ.अनामिका चव्हाण यांनी दिले. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा गुरूवारी आंदोलन करू, आता आम्ही गप्प बसणार नाही. अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशारा यावेळी तेली यांनी दिला. दरम्यान या वेळी एका बांधकाम अभियंत्याचा उपहासात्मक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.