ग्रामस्थांमध्ये घबराट ; वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी…
मालवण, ता. २८ : रेवंडी पाठोपाठ आता सर्जेकोट-मिर्याबांदा गावातही बिबट्याने दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे तत्काळ गांभीर्याने लक्ष पुरवित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यात गेले काही दिवस ग्रामीण भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. रेवंडी-कोळंब परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस अन्य पाळीव जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची माहिती वन विभागास देण्यात आली आहे.
काल रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान स्नेहल आडकर यांना वस्तीत बिबट्या घुसला असल्याचे दिसून आले. स्थानिक ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मात्र बिबट्याच्या या संचारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. मानवी वस्तीकडे बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थांना घराबाहेर पडणे जोखमीचे बनले आहे. शिवाय पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका वाढला आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.