सावंतवाडी पंचायत समितीची बैठक; सर्वच सदस्य आक्रमक…
सावंतवाडी ता.०४: शेती नुकसानी संदर्भात महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी देताना भेदभाव करण्यात आला आहे,असा आरोप पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत केला.दरम्यान या प्रश्नावरून संदीप गावडे यांच्यासह सर्वच सदस्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले.यावेळी या विषयावर तोडगा काढण्यासाठी आपण संबंधित विभागाचे अधिकारी,बीडीओ व उपसभापती यांच्या उपस्थितीत तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा करू,असे आश्वासन सभापती मानसी धुरी यांनी दिले. सौ.धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपच्या माध्यमातून ही बैठक पार पडली.
यावेळी उपसभापती शितल राऊळ,माजी सभापती पंकज पेडणेकर,बाबू सावंत,मेघश्याम काजरेकर,अक्षया खडपे,मोहन चव्हाण,सुनंदा राऊळ,प्राजक्ता केळुसकर,मनीषा गोवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी शेती विम्या संदर्भात १५ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली होती.मात्र त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही.त्यामुळे ती अंतिम तारीख वाढून देण्यात यावी,अशीही मागणी श्री.मडगावकर यांनी यावेळी केली. तसेच माडखोल धवडकी ते शिर्शिंगे पर्यंतच्या रस्त्यावर वाढलेली झाडी तोडण्यासाठी व रस्त्यालगतच्या गटाराचे काम करण्यासाठी दोन वर्षाचा ठेका संबंधित ठेकेदाराला दिला आहे.ते काम गणेश चतुर्थीच्या काळात होणे अपेक्षित होते .मात्र ते अद्याप झालेले नाही.त्यामुळे या कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कुकुट पालन आणि गांडूळ खत प्रकल्पासाठी शासनाकडून देण्यात आलेले अनुदान अध्याप शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही.ते अनुदान १५ सप्टेंबर पर्यंत देण्याचे आश्वासन पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले आहे. मात्र ते न मिळाल्यास दोन ऑक्टोबर रोजी आम्ही संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण छेडू ,असा इशारा श्री.काजरेकर यांनी दिला.