संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करावी; अन्यथा दुर्घटना घडण्याची दाट शक्यता…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.२०: वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील कुसूर-बौध्दवाडी नजिक सुखनदीवर संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी. अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
तालुक्यातील कुसुर-बौध्दवाडी नजिक सुखनदीवर संरक्षण भिंत नसल्याने याठिकाणी तीन वर्षापूर्वी झालेल्या पर्जन्यवृष्टीमध्ये रस्त्याकडील काहीसा भाग ढासळला आहे. रस्ता आणि नदीचे पात्र काही फुटावर असल्याने याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते. सुखनदीचे पात्र मोठे असल्याने भुईबावडा पंचक्रोशीतील नद्यांचे पाणी याच सुख नदीला मिळत असल्याने ही नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहते.
तीन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये या सुखनदीने रौद्र रुप धारण करुन धोक्याची पातळी ओलांडली होती. कुसुर-बौध्दवाडी नजिक मुख्य रस्त्यावर या नदीचे पाणी आल्याने वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. भविष्यात याठिकाणी संबंधित विभागाने फेरसर्व्हेक्षण करुन संरक्षण भिंत बांधण्यात यावी. अन्यथा येथील रस्ता ढासळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तरी वेळीच याठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.