शेखर माने; जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संघर्ष करणारा, भविष्यात बळ देण्यासाठी प्रयत्न…
सावंतवाडी,ता.१८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकासआघाडी मध्ये समन्वय नाही, अशी येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून तीनही पक्षांची बैठक घेऊन मार्ग काढू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक शेखर माने यांनी आज येथे दिला. दरम्यान सिंधुदुर्गातील कार्यकर्ता हा संघर्ष करणार आहे. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात संपर्क मंत्र्यांच्या माध्यमातून याठिकाणी राष्ट्रवादीला बळ दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा भव्य समारोप २३ एप्रिलला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात होणार आहे. त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी याठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. माने बोलत होते.
यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, आत्माराम ओटवणेकर, अनंत पिळणकर, भास्कर परब, नजीर शेख, सचिन पाटकर, शिवाजी घोगळे, मकरंद परब, डॉ. साठे, रवींद्र चव्हाण, ईफ्तिकार राजगुरू, प्रफुल्ल सुद्रीक, अफरोज राजगुरू, नितीन कळंगुटकर, आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.माने पुढे म्हणाले, राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा भव्य समारोप कोल्हापुरात होणार आहे. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिंधुदुर्गातून ५ ते ७ हजार कार्यकर्ते जाणार असल्याचा आकडा आजच्या बैठकीत पुढे आला आहे. त्यादृष्टीने आज नियोजन करण्यात आले. तर बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. मित्र पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहे. तसेच महा विकास आघाडी मध्ये समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या समितीच्या माध्यमातून तीनही पक्षाची बैठक घेऊन समन्वय राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तर येथील राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना श्री.माने म्हणाले, राज ठाकरे यांची भूमिका हि नाट्यमय आहे. ती भूमिका म्हणून ठाम नाही. त्यामुळे त्याकडे सर्वांनी, मनोरंजन म्हणून पहावे, अशी टीका केली. तर केंद्र सरकार बाबत बोलताना ते म्हणाले, राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यापासून राज्य सरकारला असतील करण्यासाठी केंद्रातील भाजपाचे प्रयत्न आहेत. त्यांची भूमिका ही विरोधी नसून केवळ कुरघोडी आहे. तर राज्यातील वाढत्या महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे. असा आरोप त्यांनी केला.
यावेळी भाजपाच्या आत्मनिर्भर भारत योजनेचे जिल्हाध्यक्ष आशिष नाबर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.